A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. Also Storytel Selects where you can hear some stories and parts of new Originals for free. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.
`ऑपरेशन सिंदूर`च्या निमित्ताने अनेक गोष्टींवर चर्चा, विश्लेषण होते आहे. त्याचवेळी अशा लष्करी ऑपरेशनच्या वेळी सिक्रसी (गुप्तता), सरप्राइजेस का आणि किती महत्त्वाचे असते, सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे मनोधैर्य कसे असते, कसे टिकते याविषयी ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद.
शरद पोंक्षे म्हणजे एक अवलिया कलाकार. आपल्या कट्टर सावरकरभक्तीमुळे अनेक वादळे ओढवून घेत विचारांशी असणारी बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व. कलाजीवनात आणि समाजजीवनात अशा आव्हानांना भिडताना, त्यांना नेमके काय जाणवते, याची उलगड संतोष देशपांडे यांसमवेतच्या त्यांच्या या संवादातून होते.आवर्जून ऐकावा असा हा हटके पॉडकास्ट.
इन्फर्मेशन वॉरफेअर म्हणजेच माहिती युद्धतंत्र हे माध्यमांच्या मदतीने केले जाणारे एक प्रकारचे युद्धच असते. त्यात शत्रू राष्ट्राकडून मीडिया युजर्स, चॅनल्स यांचा वापर केला जातो. कळत-नकळत अनेक जण त्यात ओढले जातात आणि त्याचा फायदा शत्रूला होतो. काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर उद्भवलेल्या प्रसंगानंतर भारत सरकारने प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमकर्त्यांना मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. या पार्श्वभूमीवर, संरक्षण माध्यमांचे अभ्यासक प्रा. विनय चाटी यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादात या `इन्फर्मेशन वॉरफेअर`ची उलगड केली आहे. आजच्या घडीला प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, समजून घ्यावा असा हा विषय.
सोन्याचा भाव लाखांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, असे नेमके कशामुळे घडले, भारतीयांना सोन्याचे इतके आकर्षण का आहे, सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरते का, भविष्यात याकडे कसे पाहायला हवे अशा अनेक बाबींचा उहापोह ज्येष्ठ संपादक, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर यांनी संतोष देशपांडे यांसोबतच्या या विशेष पॉडकास्टमध्ये केला आहे. सोन्याविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा वेगळा संवाद.
चित्रपट असो वा साहित्यकृती त्याला इतिहासाची पार्श्वभूमी असेल तर त्यातून वाद निर्माण होतात. अलीकडच्या काळात रायगडावरील वाघ्यावरुन उफाळून आलेला वाद असो, छावा चित्रपटामुळे निर्माण झालेले वातावरण असो वा फुले चित्रपटाच्या ट्रेलवरवरुन सुरु झालेला वादंग असो....चित्रपट अथवा लेखनाकडे आपण इतिहास म्हणून खरंच पाहावा का, त्यातून समाजात जाणाऱ्या संदेशाकडे कसे पाहिले जातेय, त्यातून कलास्वातंत्र्याचा संकोच होतोय का, कलास्वातंत्र्य देखील सोयीचे असेल तरच त्याचा पुरस्कार होतो का या व अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर प्रसिद्ध साहित्यिक व संशोधक संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी केलेली ही रोखठोक चर्चा.
प्रत्येक प्राण्याला मन असतं, ते व्यक्त करणारी त्यांची एक भाषाही असते. मात्र, मानवी जीवनात येणाऱ्या प्राण्यांच्या मनात काय चाललं आहे, ते काय बोलू पाहतात हे काही आपल्याला नेमकं लक्षात येत नाही. अशा वेळी टेलिपथिक अॅनिमल कम्युनिकेशन हे तंत्र उपयोगी येतं. त्यातील तज्ज्ञ असणाऱ्या प्राणीप्रेमी पत्रकार उमा कर्वे ही चक्क प्राण्यांशी संवाद साधते. हे नेमके कसे जमते, प्राणी तिच्याशी काय बोलतात, त्यांच्याशी बोलून तिला काय जाणवते या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा हा विशेष पॉडकास्ट. जागतिक पाळीव प्राणी दिनाच्या निमित्ताने, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा हा संवाद आपल्याला खूप काही शिकवून जातो.
मित्रा देसाई... जगापुढे भारतीयत्वाची खरी ओळख पुढे आणण्यासाठी संशोधन, लेखन आणि संवादातून तेजोमय भारत सारखी संकल्पना पुढे आणणारी, शीतळा, फ्लॅग ऑफ अनंता यांसारख्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या पुस्तकांची लेखिका आणि तेजोमय भारत सारख्या संकल्पनेतून भारताचा खरा इतिहास जगापुढे उलगडू पाहणारी ऑस्ट्रेलियात राहणारी मराठमोळी लेखिका. अत्यंत अभ्यासपूर्वक, सप्रमाण आपले मुद्दे मांडून त्याची उलगडून स्टोरीटेलिंग म्हणजेच गोष्टीरुपांत जगापुढे आणू पाहणारी ही विदुषि संतोष देशपांडे यांच्याशी जेव्हा संवाद साधते त्यातून कित्येक गोष्टींची सहज उलगड होत जाते... आपण प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, अनुभवावा आणि त्यातून बोध घ्यावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट.
शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील पक्षाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सामना या दैनिकाचे दिल्लीतील ब्युरो चिफ नीलेशकुमार कुलकर्णी यांनी गेली अनेक वर्षांत दिल्लीतील राजकारण विशेषतः तेथील मराठीजनांचा प्रभाव अनुभवलेला आहे. पत्रकारितेच्या निमित्ताने अनेक राजकारण्यांशी जवळून संबंध आला आहे. त्यांची नोंद ठेवतानाच दिल्लीतील संसदेच्या आठवणींचा पट उलगडणारे पुस्तक त्यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे. `संसद भवन ते सेंट्रल व्हीस्टा` हे ते बहुचर्चित पुस्तक. त्यानिमित्ताने संतोष देशपांडे यांच्याशी संवाद साधताना नीलेशकुमार यांनी दिल्लीतील राजकारणाची सच्चाई मांडली आहे आणि तिच्याशी होत असणारा `सामना`ही उलगडून दाखवला आहे.
निवेदन हे करिअरचे क्षेत्र म्हणून निवडून अत्यंत मेहनतीतून त्यात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्याची किमया स्नेहल दामले यांनी साधली आहे. अभ्यासपूर्ण, आशयघन आणि संयत अशा निवेदनशैलीमुळे स्नेहलला रसिकप्रियता लाभली आहे. सांस्कृतिक, सांगीतिक आणि राजकीय अशा तिन्ही प्रकारांतील कार्यक्रमांना तिचे निवेदन, सूत्रसंचालन उंची देऊन जाते. पुण्यातील प्रतिष्ठीत वसंतोत्सव असो, अ.भा. मराठी साहित्य संमेलन असो, जागतिक मराठी परिषदेचे संमेलन असो वा अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा असोत स्नेहलने आपली कारकिर्द बहरत नेली आहे. तिच्यासमवेतच्या या गप्पांमधून तिचा प्रवास तर उलगडतोच शिवाय निवेदनकलेतील अनेक कौशल्यांचीही उलगड होते. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठीही या गप्पा मार्गदर्शक ठराव्यात.
पुस्तक वाचनातून उत्तम वाचकच घडतो असं नव्हे तर त्यातून प्रेरणा घेत उत्तम लेखकही घडू शकतो. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित युवा लेखक, संपादक प्रणव सखदेव हे त्याचेच एक आदर्श उदाहरण. प्रणव सखदेवचा लेखनाकडे झालेला प्रवास, त्यातील अनुभव, त्याचे चौफेर वाचन आणि साहित्यनिर्मितीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन याची उलगड करणारा हा स्पेशल पॉडकास्ट.
पाकिस्तानची आजची अवस्था पाहता देश म्हणून तो सपशेल अपयशी असल्याचे पुढे येते. प्रत्येक आघाडीवर त्याची केवळ पिछेहाटच नव्हे तर तर दयनीय अवस्था झालेली आहे. हे असे का झाले, त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तेथील लष्कर काय करते, राज्यकर्ते दिशाहीन का आहेत, तिथे मध्यमवर्ग का नाहीय या व अशा प्रश्नांची मालिका पुढे येते. त्याचीच संगतवार मांडणी करणारे `पाकिस्तान का मतलब क्या` हे पुस्तक नुकतेच दाखल झाले आहे. सध्या बेस्टसेलर म्हणून गाजत असलेल्या या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीधर लोणी यांच्याशी याच विषयावर रंगलेल्या या गप्पा.
देशातील सर्वात प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थांपैकी एक आणि सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील संस्था म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यापीठातील आंदोलनांच्या अतिरेकामुळे ही सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली होती. तथापि, गेल्या अडीच-तीन वर्षांत चित्र बदलते आहे. विद्यापीठाच्या नेतृत्वात आणि पायाभूत सुविधांमध्ये नवीन बदल होत असल्याने परिस्थिती सुधारताना दिसते आहे.हे बदल काय आहेत? विद्यापीठाची शैक्षणिक प्रतिष्ठा टिकवण्याच्या दृष्टीने हे बदल कसे सकारात्मक भूमिका बजावतील? जेएनयूच्या कुलगुरु डॉ. शांतीश्री पंडीत यांची याविषयी विशेष मुलाखत.
देशाची राजधानी दिल्ली मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देते. मात्र, तरीही मराठीजनांना दिल्ली कायमच दूर वाटते. आगामी मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होते आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील टीव्ही माध्यमात कार्यरत असणारे युवा पत्रकार सोमेश कोलगे यांच्य़ाशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक वेगळ्या बाबींची उलगड झाली. मराठी माणूस दिल्लीत रमतो का, तेथील मराठी संस्कृती कशी आहे, अन्य घटकांना मराठीजनांविषयी काय वाटते अशा अनेक बाबींवर सोमेश कोलगे यांनी या सहजगप्पांमधून प्रकाश टाकला आहे.
स्टोरीटेलवर नुकतीच संपूर्ण एआय निर्मिती असणारी गोष्ट दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर, हा प्रयोग नेमका काय आहे, चीनच्या डीपसीकने अमेरिकेची झोप का उडवली आहे आणि ट्रम्पतात्यांचे धोरण काय सांगते अशा साऱ्या गोष्टींची गप्पांमधून उलगड केली आहे, योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी. नवी आणि वेगळी माहिती देणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि संपन्न व्हा!
रहस्यकथा आवडणाऱ्या वाचकांना एक नवा लेखक लाभला आहे. त्याचं नाव सौरभ वागळे. स्वतः आयआयटीएन असलेल्या या युवा लेखकाने रहस्यकथा या साहित्यप्रकारात आपली अशी एक दुनिया उभी केली आहे. त्यास वाचकांचा विशेषतः तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभतो आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांनी सौरभला त्याची ही दुनिया उलगडून दाखवण्यासाठी बोलतं केलं आहे. नव्या पिढीतील हा आश्वासक लेखक नेमकं काय वाचतो, त्याच्या लेखनामागच्या प्रेरणा कोणत्या आहेत, ऑफीस आणि लेखन यांचा मेळ तो कसा साधतो, त्याच्या कथांमधील मुख्य पात्र असणाऱ्या `डिटेक्टिव्ह अल्फा` नंतर त्याच्या मनात काय आहे...हे सारं काही जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांपर्यंतही पोहोचवा.
मनोरंजन हा मराठीतील पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रसिद्ध झाला. या अंकातील वैविध्यपूर्ण संपादकीय लेखनाबरोबरच यात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीही अत्यंत रंजक होत्या. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी या विशेष पॉडकास्टमध्ये. ११५ वर्षांपूर्वीच्या या जाहिरातींमधून त्या काळातील व्यवसाय, उद्योग ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातींमध्ये कशी भाषा वापरली जायची, हे ऐकणे रंजक ठरेल. तेव्हा अनुभवू या एक प्रकारचा `टाइम ट्रॅव्हल`!
नवे वर्ष लागल्यानंतर असे कोणते साधे-सोपे संकल्प आपण करु शकतो आणि ते पूर्ण करु शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनात नवे पर्व येईल..त्याविषयी वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी.
जगात दहशतवाद पसरवण्याबद्दल आधीच प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानची ओळख आता भिकाऱ्यांचा निर्यातदार अशीही बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यातील संबंधही बिघडण्याच्या मार्गावर आहेत. खुद्द पाकिस्तानात भिक मागणे हा एक मोठा व्यवसाय होऊन बसला आहे. हे सारं नेमकं काय चाललं आहे, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा.
अशोक रावकवी.... देशातील एलजीबीटीक्यू समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मोठे नाव. पुण्यात झालेल्या मूकनायक २०२४ या एलजीबीटीक्यू समूहाच्या साहित्य संमेलनात त्यांनी एका सत्रात आपले अनुभव सांगितले. या प्रसंगी, त्यांनी आपली समलैंगिक ओळख उघड झाली तो क्षण पुस्तकातून ज्या लेखातून मांडला, त्याचेही प्रकट वाचन झाले. खरे तर हे मोठे धाडसच म्हणायचे. मात्र, त्यांनी ते दाखवले. तेव्हाचे हे रेकॉर्डिंग.
जगभरातील मराठीजनांमध्ये आत्मविश्वास जागवत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांत उभं करण्यासाठी गर्जे मराठी ही संस्था उदयास आली. आता ही संस्था एक चळवळ बनली आहे. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी गर्जे मराठीचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू यांसमवेतच्या या संवादातून. प्रत्येक मराठीजनास अभिमान वाटावा, अशा या विचारांना ऐकणं म्हणजे मनात नव्या प्रेरणा जागवणं...
अशी कोणती कारणं आहेत, जी आपणास पुस्तकांपासून किंवा वाचनापासून दूर ठेवतात... खरं तर ही कारणं नव्हेत तर चक्क सबबी आहेत. या सबबी कोणत्या आणि त्यामुळे आपण काय गमावत आहोत, याचा वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी, तुमच्यासमवतेच्या संवादातून.
दिल्ली आणि महाराष्ट्रातील संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त फोडले असे म्हणतात...तर महाराष्ट्रगीतात महाराष्ट्र हे दिल्लीचेही तख्त राखतो असे म्हणतात. या अनुषंगाने इतिहासाचे संशोधक व प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक संबंधांचा वेध संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून घेतला आहे. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट.
जगातील एक आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणारे स्टोरीटेल भारतात येऊन ७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि योगेश दशरथ यांनी. मित्रांमधल्या सहज गप्पांमधून अमेरिकेच्या भविष्याविषयी होणारं हे भाष्य फार गंभीरपणे घेऊ नये..मात्र त्याची नोंद जरुर ठेवावी अशा अनेक गोष्टी इथे उलगडतील.
कोणतंही गाणं आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामागे त्या गायकासह अनेकांचे प्रचंड कष्ट असतात. एरव्ही गाणं म्हणणं आणि ते स्टुडिओत रेकॉर्ड करणं यात मोठा फरक आहे. कला, शास्त्र, तंत्र आणि प्रतिभा या सर्व गुणांचा मिलाफ स्टुडिओत पाहायला मिळतो. याच विषयावर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि डॉन स्टुडिओत रेकॉर्डिंग विभागाची धुरा वाहणारे प्रसिद्ध साउंड इंजिनिअर तुषार पंडीत यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून गायक आणि रेकॉर्डर यांच्यातील एक आगळं नातं पुढं आलं. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे हे दोन्ही दिग्गज त्यांच्या आजवरच्या प्रवासाकडे कसे पाहतात, त्यांचं आगळं जग त्यांनी कसं उभं केलं, त्यातील टर्निंग पॉइंटस् कोणते आणि या क्षेत्रात पुढं येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी काय तयारी करायला हवी अशा अनेक बाबींची छानशी उलगड या दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये होते. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
महाराष्ट्रातील यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी अभूतपूर्व अशी आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये सत्तेत येण्यासाठी तुंबळ लढाई सुरु झालेली आहे. दुसरीकडे सामान्य मतदारही कमालीचा अस्थिर झाल्याचे चित्र आहे. या साऱ्या चित्राकडे पाहता सध्याचे राजकारण कोठे जाते आहे, कोणाचे काय चुकते आहे, कोणत्या पक्षाची काय बलस्थाने आणि उणीवा आहेत आणि मतदारांनी नेमके काय करायला हवे याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सल्लागार राजेंद्र हुंजे यांनी आपली परखड मते मांडली आहेत, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी स्पेशल पॉडकास्ट मध्ये. जरुर ऐका, आणि हे राजकीय फटाके कोणते असतील, हे जाणून घ्या.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठं फिरायला जावं असा एक प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच, या प्रश्नाची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, पर्यटन सल्लागार व स्मिता हॉलिडेज् या नामांकित संस्थेच्या संचालक प्रज्ञा गोरे यांना. सध्या कोणती पर्यटनस्थळे ट्रेंडिंग आहेत, या सिझनमध्ये कुठे कुठे जाता येऊ शकते इथपासून ते सर्वांपेक्षा वेगळी अशी ऑफबिट डेस्टिनेशन्स कोणती आहेत, याची छानशी उकल प्रज्ञाने यामध्ये केलेली आहे. फिरायला जावेसे वाटणाऱ्यांनी आवर्जून ऐकावा, असा हा पॉडकास्ट.
दिवाळी जवळ आली की आपल्याकडे दिवाळी अंकांचे आगमन सुरु होते. यंदा `मास्टर की` नावाचा दिवाळी अंक प्रथमच वाचकांच्या भेटीस येत आहे. हा रहस्यकथा विशेषांक आहे. त्याचे स्वागत करतानाच, एकूणच दिवाळी अंकांचं रहस्यकथांशी असणारं नातं, या दिवाळी अंकातील रहस्यकथांचे वेगळेपण तसेच त्यातील संपादनाचा अनुभव या विषयावर संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे `मास्टर की` ची संपादकीय धुरा ज्यांनी सांभाळली ते संपादक सम्राट शिरवळ यांना. दिवाळी अंकांच्या दुनियेतील हा वेगळा प्रयोग रसिकांपुढे येताना त्यानिमित्त रंगलेला हा पॉडकास्ट ऐकणं हा देखील एक आगळा अनुभव ठरावा.
जगभरात मोठे अस्थिर वातावरण आहे. इस्त्रायल -इराण यांच्यातील थेट युद्ध ते अमेरिका, चीन, रशिया यांच्यातील सुप्त संघर्ष आणि त्यातून वेगाने पाहणारे जागतिक चित्र, यांचा आढावा घेतानाच असा स्थितीत, भारतात आयटी किंवा संगणक क्षेत्रात अभियंते होऊन उत्तम करिअर करु पाहणाऱ्यांपुढे काय आव्हाने असणार आहेत, याचा नेमका वेध स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून घेतला गेला आहे. आयटी क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या प्रत्येकाने अन् त्याच्या पालकांनी ऐकालयाच हवा असा हा पॉडकास्ट.
गणेशोत्सव सोहळ्यात खरे रंग भरतात ते ढोल ताशा पथकांकडून केले जाणारे जल्लोषमय वादन. पुण्यातून सुरु झालेली ही ढोल-ताशा संस्कृती आता जगभरात विस्तारली आहे. मात्र, ढोलताशा पथकांत काम करणाऱ्यांचे जग नक्की काय असते, ते कोणत्या भावनेतून वादन करतात, त्यातून त्यांना काय मिळते, ढोलताशांचे अर्थकारण काय असते, अशा पथकांपुढची आव्हाने काय असतात या व अशा अनेक प्रश्नांची उलगड पुण्यातील अग्नी या ढोलताशा पथकाचे प्रमुख मंदार गोसावी यांनी संतोष देशपांडे यांच्याशी बोलताना केली आहे. हा पॉडकास्ट एकूणच ढोलाताशांविषयी आपल्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची सहज उलगड करतो आणि त्यांच्यापुढच्या प्रश्नांनाही वाचा फोडतो.
स्वीडन...युरोपातील उत्तरेकडील एक प्रगत आणि सुंदर राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या या देशात तेथील महाराष्ट्रीय किंवा मराठी समाजाने आपली सांस्कृतिक ओळख, परंपरा जतन करण्यासाठी कायमच पुढाकार घेतला आहे. स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम येथील महाराष्ट्र मंडळ हे तेथील तमाम मराठीजनांचे प्रतिनिधित्व करते. या संघटनेच्या माध्यमातून स्टॉकहोमला मराठी भाषा, संस्कृती, परंपरा जपण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम चालविले जातात. गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी एक मोठा उत्सव असतो. गणरायांच्या आगमनाच्या निमित्ताने, स्टॉकहोम येथील मराठीजन एकत्र येऊन गणेशोत्सव कसा साजरा करीत आहेत, भाषा, संस्कृतीचे जतन करण्यासाठी ते कशा पद्धतीने कार्यरत आहेत, महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम सर्वांना एका धाग्यात बांधत हे कार्य कसे पुढे नेते आहे यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केले आहे, महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमचे प्रतिनिधी मृणाल पवार आणि अविनाश डोंगरे यांना. त्यांच्या समवेतच्या गप्पांमधून साता समुद्रापारची ही मराठी मंडळी आपल्या संस्कृती व परंपरेचे जतन करण्यासाठी किती धडपड करत असते आणि त्यांच्या मनात काय भावना असतात, याची छानशी उलगड होते.
घटनेने दिलेल्या आरक्षणात वर्गवारी व्हायला हवी का, असा एक महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चव्हाट्यावर आला आहे. घटनेने दिलेल्या आरक्षणात क्रिमिलेअरसारखे निकष लावून वंचितांतील वंचितांना पुढे यायची संधी मिळावी, असे अनेकांना वाटते, तर मूळात अशा प्रकारे भेद करता येणार नाही, असे दुसऱ्या बाजूचे म्हणणे आहे. या संवेदनशील विषयावर, ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व जातीव्यवस्थेचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी आरक्षणात वर्गवारी असायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. देशाच्या दृष्टीने आरक्षणातील वर्गवारी हा विषय किती महत्त्वाचा आहे, त्याचे काय दूरगामी परिणाम होऊ शकतात याची उलगड करणारा हा परखड पॉडकास्ट.
आगामी काळात जगभरात नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे भाकित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, नोकरी ही संकल्पना कशी बदलते आहे, का बदलते आहे तसेच वेगळ्या भाषा शिकल्याने करिअरचा आलेख उंचावता येणे कसे शक्य आहे, याविषय विश्लेषण केले आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या या गप्पांमधून. जरुर ऐका आणि भविष्याचा कानोसा आताच घ्या.
उद्यमी तरुणाई हे भारताचे भूषण. ज्या तरुण उद्योजकांनी आपल्या पूर्वीच्या पिढीपासून आलेला उद्योगाचा वारसा पुढे नेताना आपला स्वतःचा ठसा उमटविला आणि आपल्या उद्योगाला नवी दिशा दिली, अशा नेक्स्टजेन उद्योजकांच्या यशाची गाथा म्हणजेच मूव्हिंग ॲस्पिरेशन्स. प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून आपल्यापुढे आलेली ही नवकर्तृत्वाची शोधयात्रा दोन भागांमधून मुद्रित तसेच पॉडकास्ट माध्यमातून श्राव्यरुपात वाचक-श्रोत्यांपुढे आली आहे. यानिमित्ताने, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून या अभिनव प्रयोगाची सहज उलगड तर होतेच आणि त्यातून दत्ता जोशी यांना आपल्या उद्ममशील लेखनप्रवासातून गवसलेली उद्यमशीलतेची स्पंदनेही आपणास ऐकू येतात. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा कट्टा स्पेशल पॉडकास्ट जरुर ऐका...
आगामी अ.भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्याचे निश्चित झाले. मात्र, त्यावर महाराष्ट्रातील अनेकांनी, विशेषतः ग्रंथविक्रेत्यांनी नापसंती व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, दिल्लीमध्ये मराठी साहित्य आयोजित करणे का ऐतिहासिक आहे, त्यातून नेमके काय साध्य होणार आहे याविषयी परखड भाष्य केले आहे ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक संजय सोनवणी यांनी. संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या कट्ट्यावरील गप्पांमध्ये सोनवणी यांनी मराठी लोकांच्या दिल्लीकडे पाहण्याच्या मानसिकतेवरही भाष्य केले आहे.
किशोरकुमार असं नुसतं म्हटलं तरी त्याची असंख्य गाणी मनात गुंजू लागतात. मन प्रसन्न करुन जातात. कैक पिढ्यांचं भावजीवन त्यांच्या जादुई आवाजावर पोसलं गेलं आहे. अशा या किशोरदांना गुरुस्थानी मानून गेली २५ वर्षे अविरत गायन करणारे आणि `व्हाइस ऑफ किशोरकुमार` अशी कीर्ती लाभलेले प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांचे `किशोरमय` विश्व देखील अद्भूत आहे. हे विश्व जाणून घेण्यासाठी, त्यांच्या नजरेतील किशोरदा जाणून घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी त्यांना बोलतं केलं आणि स्टोरीटेल कट्ट्यावर रंगली किशोरदांवरची मैफल...या हुरहुन्नरी, अजरामर कलाकाराच्या जन्मदिनाच्या (४ ऑगस्ट) पूर्वसंध्येला, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी..तुमच्या-आमच्या मनातील किशोरदांच्या गाण्यांना पुन्हा ओठावर आणण्यासाठी! कट्ट्यावरची ही स्पेशल मैफल, किशोरदांना अर्पण!
सध्या जगभरात अनेक पातळ्यांवर उलाथापालथ सुरु आहे. क्रीडा क्षेत्रात टी२० वर्ल्डकप, विम्बल्डन, युरो, कोपा अमेरिका अशा स्पर्धांनी मागचा आठवडा गाजवला. तोवर मुद्दा पेटला तो अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा. त्यानिमित्ताने, अमेरिकेत हे गन-कल्चर कसे आहे, त्याची मूळं कुठे आहेत याचा वेध घेतला स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश देशपांडे आणि संतोष देशपांडे यांनी या पॉडकास्टमधून. ग्लोबल विषयांचा हा धावता आढावा घेताना इथे योगेशने दिल्या आहेत स्टोरीटेलवरील काही इंटरेस्टिंग बुक टीप्स! जरुर ऐका..
पंढरपूरला विठुरायाच्या ओढीने अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी धाव घेतात. या वारीमध्ये असं नेमकं काय असतं, जे त्यांना एका सूत्रात बांधतं? अलीकडच्या काळात वारीला इव्हेंट म्हणून पाहणारा वर्ग उदयास येताना दिसतो. त्याचवेळी राज्यातील सामाजिक वातावरणही जाती-जातींमधील अविश्वासातून बिघडू पाहते आहे. या पार्श्वभूमीवर, वारी म्हणजे नेमके काय, ती काय साध्य करते, काय संदेश देते यावर संत साहित्याचे अभ्यासक, पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी परखड भाष्य केले आहे. संतोष देशपांडे यांसमवेत त्यांनी साधलेल्या या संवादातून वारीचे नेमके आकलन तर होतेच शिवाय महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेतून महाराष्ट्र धर्माचे दर्शन होते. प्रत्येकाने मन लावून ऐकावा आणि हृदयात साठवावा, असा हा संवाद `या हृदयीचा त्या हृदयी` पोहोचावा.
आर्थिक गुन्हेगारी उघडकीस आणणारे फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे नेमके काय, त्यात काय केले जाते, देशातील अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आणण्यात या तज्ज्ञांचे योगदान किती मोठे आहे या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठी नवीन आहेत. पुण्यातील फॉरेन्सिक ऑडिटर अपूर्वा जोशी यांनी याच विषयावर लिहिलेले आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. ते सध्या अत्यंत गाजते आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द लेखिका अपूर्वा जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक अज्ञात पैलू उलगडत गेले. जरुर ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवावा असा हा कट्टा स्पेशल पॉडकास्ट.
पर्यटन हे फक्त मनास विरंगुळा म्हणून असतं का? नाही! पर्यटनातून त्याहून वेगळं काही साध्य होत असतं. त्यातून आपला दृष्टिकोन विकसित होतो. युरोपमध्ये काही दिवसांपूर्वी भ्रमंती केल्यानंतर ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर आणि संतोष देशपांडे यांना काही वेगळं गवसलं... त्याची, त्यांच्याच गप्पांमधून उलगड करणारा हा अत्यंत वेगळा पॉडकास्ट. प्रत्येकानं जरुर ऐकावा अन् वेगळ्या दुनियेतील डोळस मुशाफिरी करावी.
आपल्या अजरामर कलाकृतींमधून कैक दशके कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणजेच `डायरेक्टर्स` आता नव्याने आपल्या भेटीस आले आहेत. होय, प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या `डायरेक्टर्स` या पुस्तकातून निवडक भारतीय दिग्दशर्कांच्या कलाप्रवासाचा ओघवता आस्वाद रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या ग्रंथनिर्मितीमागची पटकथा काय होती, हे दीपा देशमुख यांसमवेतच्या या संवादातून संतोष देशपांडे यांनी या विशेष पॉडकास्टमधून आपणापुढे आणली आहे. कोणत्या दिग्दर्शकाची कोणती वैशिष्ट्ये आहेत, त्यांच्यातील वेगळेपण कशात आहे आणि हे सारं पुस्तकातून आस्वादित करताना काय अनुभव आले, याची सुरेल उलगड दीपा देशमुख यांनी केली आहे. आपल्या मनातील रसिकतेचा पत्ता शोधू पाहणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
मनोरंजन क्षेत्र विशेषत: चित्रपट निर्मिती अर्थात 'फिल्ममेकिंग' अनेकांना करिअर साठी साद घालते. प्रत्यक्षात हे क्षेत्र कसे आहे, त्यात करियर कसे होते? त्यासाठी शिक्षणाच्या संधी कोणत्या आहेत, या विषयावर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व माध्यमकर्मी प्रसाद नामजोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद तुम्हाला नेमकी दिशा देऊन जातो!
मुलांचे पुस्तकांशी नाते जडले तर त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते, मनात प्रेरणा पेरल्या जातात. याकामी शालेय ग्रंथालये मोठी भूमिका बजावू शकतात. प्रत्यक्षात, आज शाळेतील ग्रंथालयांची स्थिती कशी आहे, यावर संशोधन करुन पीएचडी मिळविलेल्या सीमा तारे यांनी अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आहेत. त्याचाच वेध घेणारा कट्ट्यावर रंगलेला हा संवाद प्रत्येक शिक्षक, पालक आणि पुस्तकप्रेमी घटकाने ऐकायलाच हवा!
निर्मितीची प्रक्रिया ही एका अर्थाने अतिशय सहज, सोपी असते तर दुसऱ्या अर्थाने अत्यंत कठीण. विशेषतः कलाक्षेत्रात.. जिथे तुमच्या भावभावनाही तुमच्या प्रतिभेच्या कर्तृत्वाच्या साक्षी असतात.... मिलिंद जोशी यांनी अशा कलाक्षेत्रात आपल्यातील सृजनशीलतेला एका आशयघन जगण्याचे जणू एक माध्यमच बनवले... नेमके कसे... ऐका त्यांच्यांच शब्दांत. शब्द, सूर, स्वर आणि भावनांच्या एकात्मेचे क्षितिज शोधू पाहणाऱ्या या कलाकाराच्या ` सृजनाच्या वाटेवर`च्या गप्पांचा हा उत्तरार्ध. केवळ ऐकू नका तर मनातही साठवा. कदाचित, तुमचीच तुमच्याशी नव्यानं ओळख होईल.
सर्जनशीलतेची अनिवार ओढ मनात असेल तर आपला `आरसा` होतो म्हणजे नेमकं काय घडतं?शब्द, स्वर, संगीत आणि अमूर्त चित्रांच्या आगळ्या विश्वात रममाण होत आगळं जगणं जगणारे प्रतिभावंत कलाकार मिलिंद जोशी यांनी आपल्या सृजनरंगात रंगण्याचा प्रवास खास कट्ट्याच्या श्रोत्यांपुढे उलगडून दाखविला आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या संवेदनशील कलाकाराची, त्याच्या भावविश्वाची हळूवार उलगड मिलिंद जोशी यांच्या समवेत संतोष देशपांडे यांनी मारलेल्या या गप्पांमधून होतो. अशा या सृजनाच्या वाटेवरच्या गप्पांचा हा पूर्वार्ध तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल, हे नक्की.
दहावी-बारावीनंतर आता खरे वेध लागले आहेत ते पुढच्या करिअरसाठी अभ्यासक्रम निवडण्याचे. खरं तर करिअर मार्गदर्शन हे वेळेवर आणि अचूक होणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच खास कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक प्रा. केदार टाकळकर यांना. करिअरची निवड कशी करावी हे सांगतानाच टाकळकर सरांनी अनेक गोष्टींची सहज आणि सोप्या शब्दांत उलगड करुन दिली आहे, छानशा टिप्सही दिल्या आहेत. करिअरविषयी विचारात असणाऱ्या प्रत्येकाने जरुर ऐकावा असा हा विशेष पॉडकास्ट.
प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते महेश कोठारे हे मराठी सिनेजगतातील सुपरस्टार. त्यांनी लिहिलेले `डॅम इट आणि बरंच काही...` हे आत्मचरित्र त्यांच्याच आवाजात आता `स्टोरीटेल`वर आले आहे. त्यानिमित्त पुण्यात त्यांचा विशेष गौरव झाला. त्या प्रसंगी खुद्द महेश कोठारे, ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, सिनेपत्रकार व तारांगणचे संपादक मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. त्यात कोठारे यांनी या आत्मचरित्रामागची पार्श्वभूमी उलगडून दाखविली, फुटाणे यांनी कोठारे यांच्या चित्रपटसेवेतील महत्त्व अधोरेखित केले, तर मंदार जोशी यांनी या पुस्तकाच्या निर्मितीवेळच्या आठवणींना उजाळा दिला. स्टोरीटेल वर `डॅम इट आणि बरंच काही` ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/damn-it-ani-barech-kahi-2819989
आपल्या कसदार लेखणीतून ग्रामीण मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देणारा लेखक अशी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची साहित्यजगतात ओळख आहेच. हा व्रतस्थ लेखक आपल्या कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी बोलता झाला आहे. प्रा. चंदनशिव सरांनी संतोष देशपांडे यांसमवेत संवाद साधताना मराठी साहित्यातील विविध प्रवाह, त्यांचा प्रवास, त्यातील विविध टप्पे यांची उलगड करुन दाखवली आहे. ज्यास आपण समकालीन साहित्य म्हणतो, ते नेमके काय आहे, चिरंतन टिकणारं साहित्य कोणतं इथपासून ते काय वाचावं इथपर्यंत त्यांनी आपल्या चिंतनात सुरेख भाष्य केलं आहे. तमाम मराठी साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरेल, असा हा पॉडकास्ट प्रत्येकाने आवर्जून ऐकायलाच हवा आणि इतरांपर्यंत पोहोचवायलाच हवा...कारण हा आहे एक आगळा आणि अनमोल असा साहित्यिक दस्तऐवज.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान वेगाने सर्वत्र विस्तारत आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात चांगले करिअर घडण्यासाठी काय शिकायला हवे, कोणता दृष्टिकोन विकसित करावा लागेल, याची माहिती सर्वांना असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर याच विषयी मार्गदर्शन केले आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या संवादातून. प्रत्येक सजग पालकाने आणि करिअरविषयी गंभीर असणाऱ्या विद्यार्थ्याने ऐकायलाच हवा, असा हा पॉडकास्ट.
सुनील महाजन म्हणजे आपल्या सांस्कृतिक चळवळीस वाहून घेतलेले एक अवलिया व्यक्तिमत्व. आपल्या `संवाद, पुणे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर बालनाट्य चळवळ, नाटक, चित्रपट, साहित्य अशा विविध प्रांतांत विलक्षण उत्साहाने अनेक संकल्पना रुजविल्या, त्यातील व्यक्तिमत्वं घडविली, माणसं जोडली आणि त्यांच्या सुखदुःखाच्या क्षणी खंबीरपणे पाठीशीही उभे राहिले. नुकतेच त्यांनी वयाची ६१ वर्षे पूर्ण केली आणि त्यानिमित्त त्यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं तेव्हा उलगडला तो त्यांचा थक्क करणारा प्रवास. सांस्कृतिक चळवळीतील सच्चा कार्यकर्ता असं बिरुद अभिमानाने मिरवू पाहणाऱ्या सुनील महाजनांचा हा प्रवास, त्यांना आलेले अनुभव ऐकणं, हा देखील एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो.
आजच्या बदलांचा वेग लक्षात घेता भविष्यातील मानवजीवन, त्याची व्यवस्था, तेव्हाचे जगाचे मानसिक वास्तव याचा भेदक वेध घेणारी विलक्षण कादंबरी प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिली आहे. ती नुकतीच प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने आजचे भविष्य अन् उद्याचा इतिहास यांच्या दरम्यान उलगड जाणाऱ्या अनेक पैलूंचा वेध एका विलक्षण कथानकातून कसा घेता आला, याची उलगड संजय सोनवणी यांनी संतोष देशपांडे यांच्यासमवेत रंगलेल्या या गप्पांमधून केली आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उद्योगक्षेत्रात काळाच्या पुढचा विचार करीत सोनवणी यांनी स्वतः ज्यावर मोठे काम केले होते अशा `हेलिकार` तसेच `कॉन्टम फिजिक्स`सारख्या संकल्पनांची उकलही या संवादातून प्रथमच श्रोत्यांपुढे होते. प्रत्येकाचे आवर्जून ऐकावा असा हा संवाद नवी दृष्टी देऊन जातो.